यंदा स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव साजरा केला जात आहे. साठ वर्षांचा टप्पा गाठण्याला मानवी आयुष्यात आगळे महत्त्व आहे. देशाच्या विशेषतः भारतासारख्या हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या खंडप्राय अशा अतिप्राचीन देशाच्या वाटचालीतील साठ वर्षे म्हणजे विशेष मोठा टप्पा नव्हे; परंतु आधुनिक राष्ट्र-राज्य संकल्पना रुजल्यानंतर प्रथमच एक स्वतंत्र, स्वायत्त, प्रजासत्ताक देश म्हणून भारताने साठ वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. त्यामुळे त्याला अधिक महत्त्व आहे. भारत स्वतंत्र होत असताना जगही एक नव्या वळणावर येऊन ठेपले होते. दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते. साम्राज्यवाद, वसाहतवाद या संकल्पनांना मूठमाती द्यावी लागणार अशी स्थिती निर्माण झाली होती. भारत स्वतंत्र झाला आणि वसाहतवादाला मोठा धक्का बसला अन् नंतरच्या काही वर्षांत अनेक देश स्वतंत्र झाले.
या सर्व देशांशी तुलना करता भारताच्या काही जमेच्या बाजू आहेत. महत्त्वाचे म्हणजे अन्य सारे देश हुकुमशाही किंवा लष्करशाहीच्या मार्गाने गेले; परंतु भारतात तसे काही घडले नाही. येथे लोकशाही रुजविली गेली आणि हळूहळू ती परिपक्व होत आहे. भारत हा देशच मुळात मोठा. जणू एक खंडच. त्यातच येथे धार्मिक, वांशिक, भाषक अशा अनेक प्रकारचे वैविध्य. त्यामुळे लवकरच या देशाची शकले उडतील, "बाल्कनायझेशन' होईल, अशी मते सुरवातीच्या काळात ठामपणे मांडण्यात येत होते. आतापर्यंतच्या वाटचालीत भारताने ही मते खोटी ठरविली आहेत. भारतवासीयांनी विविधता असूनही एकात्मतेचा धागा घट्ट ठेवला आहे. गेल्या साठ वर्षांत भारताने बरेच काही कमावले आहे. एरवी जगाच्या खिजगणतीतही नसलेला भारत आज साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेत आहे. एक नवीन आर्थिक शक्ती म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. येथील जनता- विशेषतः - येथील उच्च आणि मध्यमवर्गीयांत विलक्षण आत्मविश्वास निर्माण झाला आहे. म्हणूनच "इंडिया शायनिंग', "इंडिया रायझिंग', "इंडिया पॉईज्ड'.. अशा संज्ञा वापरल्या जाऊ लागल्या आहेत.
खरेच "इंडिया शाईन' होतोय. "सिलिकॉन व्हॅली'त भारताच्या "आयटी' अभियंत्यांना मान मिळतो आहे, भारतीय उद्योगपती बड्या बहुराष्ट्रीय कंपन्या विकत घेत आहेत, शिल्पा शेट्टीसारख्या हिंदी चित्रसृष्टीतील दुसऱ्या फळीतील अभिनेत्रीला ब्रिटनमधील विद्यापीठ डॉक्टरेट देत आहे, भारतातील अब्जाधीशांची संख्या वाढते आहे आणि "इंडिया' नावाच्या ब्रॅंडचे मूल्यही वाढते आहे. "इंडिया' जोमात, जोशात आहे हेच खरे. यातील "इंडिया' हा शब्द महत्त्वाचा आहे. कारण हा "इंडिया' आपल्यातील "भारता'ला विसरू पाहत आहे. भारतात "इंडिया' आणि "भारत' असे दोन वेगळे जग असल्याचे म्हटले जाते आणि ते खरेच आहे. "इंडिया'ची प्रगती होत आहे आणि "भारत' आहे तिथेच आहे.
अब्जाधीशांच्या जागतिक यादीत भारतीय श्रीमंतांची संख्या वाढत असली, तरी "भारता'तील दारिद्य्र अद्याप मिटलेले नाही. अजूनही 30 कोटी लोक दारिद्य्ररेषेच्या खाली आहेत. खासगी आरोग्य सेवेत भारताचा क्रमांक पहिल्या पाच देशांत लागतो; पण सार्वजनिक आरोग्य सेवेच्या बाबतीत भारत तळाच्या पाच देशांत श्रीलंका, बांगलादेश यांच्या खालोखाल आहे. दिल्लीसारख्या शहरात 93 टक्के लोकांकडे लॅंडलाईन किंवा मोबाईल फोन आहे; परंतु ग्रामीण भारतात केवळ दोन टक्के लोकांकडेच फोन आहे. "आयआयटी' आणि "आयआयएम' मुळे शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केल्याचे समाधान वाटत असतानाच देशात अजूनही पाच कोटी मुले शाळेतच जात नाहीत, ही कटू वस्तुस्थिती समोर येते. जे शाळेत जातात, त्यांपैकी 40 टक्के मुलांना व्यवस्थित लिहिता-वाचताही येत नाही. सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे, अशी मागणी महात्मा फुले यांनी हंटर आयोगापुढे साक्ष देताना सव्वाशे वर्षांपूर्वी केली होती. ती अजूनही प्रत्यक्षात आलेली नाही. सर्व क्षेत्रांत मुली आघाडी घेत असल्याबद्दल आनंद व्यक्त करीत असतानाच मुलींचे घटत असलेल्या जन्मदराची आकडेवारी समोर येते. विरोधाभासांची ही यादी संपणारी नाही.
याचा अर्थ एकच, की विकासाची गंगा खालच्या स्तरांपर्यंत पोचलीच नाही. ज्यांच्यापर्यंत ती पोचली त्यांनी त्यात हात धुवून घेतलाच; परंतु ती त्यांनी अडविलीही. विकासगंगेवर अशा प्रकारे अनेक बांध निर्माण झाले आणि त्यामुळे तळागाळातील जनता तशीच तहानलेली राहिली. राज्यकर्ते, राजकारणी, नोकरशाही, उद्योगपती.. थोडक्यात उच्च आणि उच्च मध्यमवर्गातील बहुतेकांनी कळत-नकळत बांध निर्माण केले आणि आपला फायदा करून घेतला. "इंडिया शायनिंग' झाले आहे ते या प्रक्रियेतून. तरीही "इंडिया पॉईज्ड' असे अभिमानाने मिरविणाऱ्यांना याबद्दल ना खंत आहे ना खेद. शरीराचा एखादाच अवयव जेव्हा वाढतो तेव्हा ते सुदृढपणाचे नव्हे, ते रोगाचे लक्षण असते याची त्यांना जाणीव नाही. ही वाढ म्हणजे सूज असते. आज भारतातही नेमके हेच घडले आहे. ही सूज नाहीशी करायची असेल, तर विकासाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत जायला हवी, त्यांना विकासप्रक्रियेत सहभागी करून घ्यायला हवे. तरच "इंडिया शाईन' होईल. स्वातंत्र्याच्या साठीनिमित्त ही जाणीव झाली तरी पुष्कळ आहे.
Monday, August 13, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
साठी? छे! राजकारण्यांची बुद्धी नाठी!
देशाच्या स्वातंत्र्याने साठी गाठली, ही चांगलीच गोष्ट आहे. पण या साठ वर्षांमध्ये राजकारण्यांची बुद्धी नाठी बनली आहे, त्याचे काय? स्वहितापुढे देशाच्या हिताचे कुणालाच काही नाही. प्रत्येक जण आपले पोट भरण्याच्या मागे लागला आहे. लग्नाच्या पंक्तीत पोटातल्या भुकेपेक्षा जास्त वाढून घेण्यातच काही जण मोठेपण मानतात. राजकारण्यांचेही तसेच झाले आहे. त्यामुळे देशातला वंचित हा वंचितच राहिला. हे जग 'आहे रे'चेच आहे. 'नाही रे' वर्गाला इथे स्थानच नाही. नुसती साठी साजरी करून चालणार नाही. साठीत येणाऱा सुयोग्य पोक्तपणाही दिसला पाहिजे.
You are right. "India" is prospering at the cost of "Bharat". Unfortunately nobody is talking seriously about it. All benefeciaries are in fact blocking the benefits and hence they are not percolating down.
India has really progressed in last 60 years. Still there are many problems.
Oi, achei teu blog pelo google tá bem interessante gostei desse post. Quando der dá uma passada pelo meu blog, é sobre camisetas personalizadas, mostra passo a passo como criar uma camiseta personalizada bem maneira. Se você quiser linkar meu blog no seu eu ficaria agradecido, até mais e sucesso.(If you speak English can see the version in English of the Camiseta Personalizada.If he will be possible add my blog in your blogroll I thankful, bye friend).
Looks like you are an expert in this field, you really got some great points there, thanks.
- Robson
Post a Comment