Sunday, September 30, 2007

विज्ञान- न संपणारा प्रवास


पदार्थ हा कणाकणांनी बनलेला असतो. त्याच्या लहानातल्या लहान कणाला अणू असे म्हटले जाते. हा अणू अविनाशी असल्याचे मानले जात होते. अणूसाठी इंग्रजीत "ऍटम' हा शब्दप्रयोग केला जातो. ग्रीक भाषेत त्याला "ऍटमस' असे म्हटले जाते आणि त्याचा अर्थ आहे- ज्याचे विभाजन करता येत नाही, असा तो. मात्र, हळूहळू अणूचेही विभाजन करता येणे शक्‍य असल्याचे लक्षात आले. अणूच्या अंतरंगात एक केंद्रक असतो आणि त्याच्या भोवती इलेक्‍ट्रॉन्स फिरत असतात, केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, हे संशोधनातून स्पष्ट झाले. प्रोटॉनही कशापासून तरी म्हणजे क्वार्कपासून बनलेले असल्याचेही कालांतराने लक्षात आले...

* * *

पृथ्वी स्थिर असून सूर्य-चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्याचा समज एके काळी होता. मात्र, तो चुकीचा असल्याचे शास्त्रज्ञांनी दाखवून दिले. सूर्य हा तारा असून, पृथ्वीसह अन्य ग्रह त्याच्याभोवती फिरत असल्याचे मान्य झाले. सुरवातीच्या काळात बुध, मंगळ, शुक्र, गुरू आणि शनी हे अन्य ग्रह असल्याचे लक्षात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुर्बिणी उपलब्ध होत गेल्या, तसा युरेनस, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांचाही शोध लागला. मात्र, प्लुटोसारखे आणखीही काही गोल सूर्यमालेत असल्याचे स्पष्ट होत गेले. त्यामुळे प्लुटोला ग्रह म्हणावे की नाही याबद्दल प्रश्‍न निर्माण झाला. अखेरीस चार-पाच महिन्यांपूर्वीच जगभरातील खगोलशास्त्रज्ञ एकत्र आले आणि त्यांनी ग्रहाची नवीन व्याख्या करण्यात आली. त्यानुसार प्लुटो स्वतंत्र ग्रह नसल्याचे या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले...

* * *

विज्ञानात एखादी बाब वा सिद्धांत प्रस्थापित झाला म्हणजे ते अंतिम सत्यच असते असे नाही, हे सांगणारी ही उदाहरणे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. एखादी रूढ समजूत किंवा नियम चुकीचा असल्याचे शास्त्रज्ञांनी निदर्शनास आणून दिल्याची अनेक उदाहरणे इतिहासात सापडतात. वैज्ञानिक सत्य समाजाच्या गळी उतरविताना अनेक शास्त्रज्ञांनी स्वतःच्या प्राणांचीही पर्वा केलेली नाही. अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत.

निरीक्षण आणि सार्वत्रिक अनुभूती यांद्वारे प्रस्थापित सत्य हे असत्य असल्याचे स्पष्ट झाल्यास विज्ञान त्याचा स्वीकार करते. विज्ञान हे नेहमीच सत्याच्या शोधात असते आणि ते गवसल्याचा दावा ते कधीच करीत नाही. म्हणूनच, "तज्ज्ञांची सार्वत्रिक मान्यता मिळू शकेल अशा निश्‍चित विधानांचा न संपणारा शोध म्हणजे विज्ञान,' अशी विज्ञानाची एक व्याख्या केली जाते. मराठी विश्वकोशात या व्याख्येचा समावेश करण्यात आला आहे. वास्तविक विज्ञानाची एकच एक अशी व्याख्या नाही. निसर्ग आणि भौतिक जग समजून घेण्याची मानवी प्रवृत्ती म्हणजे विज्ञान. ही प्रवृत्ती कधीही संपणार नाही आणि त्यामुळे विज्ञानाचा प्रवासही न संपणारा आहे.

विज्ञानाला इंग्रजीत "सायन्स' असे म्हणतात. "सायन्शिआ' या लॅटिन शब्दावरून तो घेण्यात आला आहे. "माहीत करून घेणे' हा त्याचा अर्थ. विशिष्ट पद्धतीने केलेल्या अभ्यासाला विज्ञान म्हणता येईल. या अभ्यासाला एक शिस्त असते. त्याची एक पद्धत असते. निरीक्षणे, प्रयोग हे त्यामधील प्रमुख घटक असतात. हा अभ्यास तपासता येऊ शकतो आणि जगात कोठेही त्याचा पडताळाही घेता येऊ शकतो. कालांतराने पडताळा घेताना आधीच्या निष्कर्षात काही बदल झाल्यास आणि त्याचाही सार्वत्रिक अनुभव आल्यास त्यात त्यानुसार बदलही करता येऊ शकतो. म्हणजेच सतत दुरुस्ती करण्याची सोय विज्ञानात आहे. विज्ञान हे अशा प्रकारे प्रवाही असते. त्याचे ज्ञान प्रगतिशील असते. त्यामुळे विज्ञान हे अन्य ज्ञानशाखांपेक्षा वेगळे ठरते. विज्ञानात वैयक्तिक अनुभूतीला आणि वैयक्तिक समजुतीला स्थान नाही. विज्ञान वस्तुनिष्ठ असते, स्थळ आणि काळनिरपेक्ष असते. अर्थात प्रत्येक वैज्ञानिक नियमाला विशिष्ट पद्धत, विशिष्ट निकष लागू होतात. या नियमांचा अन्यत्र पडताळा घेताना पद्धत आणि निकष सारखे असणे आवश्‍यक असते.

विश्वकोशात विज्ञानाच्या काही व्याख्या दिल्या आहेत. त्यांपैकी एक अशी ः "विज्ञान म्हणजे सुसंघटित विशेष ज्ञान.' अमुक म्हणजे काय हीच प्रेरणा असल्याने विज्ञानाची व्याप्ती मोठी आहे. पदार्थाच्या अतिसूक्ष्म कणांपासून अवकाशापर्यंत नानाविध विषयांचा अभ्यास विज्ञानाद्वारे होतो. मात्र, ढोबळमानाने भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र असे वर्गीकरण करता येते. दोहोंमध्ये निसर्ग, भोवतालचे जग आणि सजीव यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास केला जातो. त्यातूनच विज्ञानाच्या नव्या शाखांचा जन्म होतो. म्हणूनच विज्ञान हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग आहे. त्यामुळे विज्ञान म्हणजे काहीतरी अगम्य, शास्त्रज्ञांपुरता मर्यादित असलेले ज्ञान असे वाटण्याचे काहीही कारण नाही.

आधी म्हटल्याप्रमाणे विज्ञान नेहमीच सत्याचा शोध घेत असतो. आणि त्यासाठीची साधने असतात- वस्तुनिष्ठ निरीक्षणे, प्रयोग, बुद्धिप्रामाण्यवाद आणि विश्वासार्ह माहितीची देवाण-घेवाण. मात्र, कधी-कधी याच साधनांचा दुरुपयोग करीत बनावट संशोधनही झाल्याची उदाहरणे आहेत. "पिल्टडाऊन मॅन'चे उदाहरण प्रसिद्ध आहे. गेल्या शतकाच्या सुरवातीला एका हौशी भूगर्भशास्त्रज्ञास इंग्लंडमधील ससेक्‍स येथील पिल्टडाऊन येथे कवटी आणि जबड्याच्या हाडांचे अवशेष सापडले. सुमारे दहा लाख वर्षांपूर्वीच्या मानवाच्या हाडांचे हे अवशेष असल्याचे 1912 मधील शास्त्रज्ञांच्या एका बैठकीत जाहीर करण्यात आले. या मानवाचे "पिल्टडाऊन मॅन' असे नामकरणही करण्यात आले. मानवी उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा दुवा हाती लागल्याचे सांगण्यात आले. मात्र, अनेक शास्त्रज्ञांनी या शोधास आक्षेप घेतला. 1950 च्या सुमारास या हाडांच्या अवशेषांचे आधुनिक पद्धतीने रासायनिक विश्‍लेषण करण्यात आले. तेव्हा लक्षात आले, की दोन वेगळ्या स्रोतांचे ते अवशेष आहेत! आणि ती सहाशे वर्षांपेक्षा अधिक जुनी नसल्याचेही स्पष्ट झाले.

कार्यकारणभाव तपासणे हे विज्ञानाचे मूळ उद्दिष्ट आहे; मात्र त्याचबरोबर "मानवाचे कल्याण' हेही उद्दिष्ट असतेच. म्हणूनच विज्ञानातील अनेक सिद्धांतांचा, नियमांचा वापर करून तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. आजची आपली सारी जीवनशैलीच मुळी तंत्रज्ञानाने व्यापलेली आहे. त्यामुळे स्वयंपाकघरापासून दिवाणखान्यापर्यंत सर्वत्र तंत्रज्ञानाचा वापर आपण करीत आहोत. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे मानवाचे जगणे केवळ सुसह्यच नव्हे तर सुखद झाले आहे आणि आता तर ते सुखाच्या पलीकडे- चंगळवादाकडे- झुकले आहे. निसर्गाचा अभ्यास करता-करता, निसर्गातील कोडी सोडविता-सोडविता निसर्गावर मात करण्यापर्यंत मानवाची मजल गेली आहे. म्हणूनच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि आता "वैश्विक तापमानवाढी'सारखी समस्या निर्माण झाली आहे.

विज्ञानाच्या साह्याने माणूस एकीकडे परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेत आहे आणि दुसरीकडे देश-धर्म-अस्मिता यांच्या नावाखाली पृथ्वीवरील माणसांचाच- आपल्या भाईबंदांचाच- जीवही घेत आहे. त्यासाठी विज्ञानाचाही वापर करीत आहे. खरे तर विज्ञानाचा- तंत्रज्ञानाचा गैरवापर आहे. आणि त्यात विज्ञानाचा कोणताही दोष नाही. अणूच्या विभाजनातून मुक्त होणाऱ्या मोठ्या ऊर्जेचा वापर वीजनिर्मितीसाठी करायचा की बॉम्ब बनविण्यासाठी करायचा याचा निर्णय मानव करीत असतो. सोनोग्राफी तंत्राने रोगनिदानासाठी शरीराच्या अंतरंगात डोकवायचे, की गर्भ मुलीचा आहे का मुलाचा हे पाहायचे याचाही निर्णय माणसाने करायचा असतो.

निसर्ग समजून घेणे, त्याचे नियम तपासणे, काही मूलभूत नियमांचा वापर करून तंत्रज्ञान विकसित करणे आणि हेच तंत्रज्ञान निसर्गाच्या आणि मानवाच्या विरोधात वापरणे.. या वेगवेगळ्या आणि स्वतंत्र बाबी आहेत आणि त्या साऱ्यांच्या मुळाशी मानवी प्रकृती आहे. त्यामुळे वैज्ञानिक वृत्ती जोपासत असतानाच विवेकही जागृत असणे आवश्‍यक असतो. या दोहोंच्या संगमातच मानवाचे कल्याण आणि पर्यायाने शांतता सामावलेली आहे.

(पूर्वप्रसिद्धी- सकाळ, 22 फेब्रुवारी 2007)

Sunday, September 23, 2007

ओझे अपेक्षांचे


"ट्‌वेंटी-ट्‌वेंटी' या क्रिकेटच्या लघुत्तम आवृत्तीच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारुन भारतीय संघाने सर्वांनाच चकीत करून टाकले आहे. पाच-एक महिन्यांपूर्वी झालेल्या एक दिवसीय क्रिकेटच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतच भारत गारद झाला होता. त्यामुळे आताच्या या स्पर्धेत भारत काही चमकदार कामगिरी करू शकेल, असे कोणालाच वाटत नव्हते. परिणामी या संघाकडून कोणत्याही अपेक्षा नव्हत्या. तो प्राथमिक फेरीत गारद झाला असता, तरी फारशी चुटपूट वाटली नसती. म्हणूनच प्रसार माध्यमांतही या स्पर्धेचा गाजावाजा नव्हता. क्रिकेटविषयक जाहिरातींचा भडिमार नव्हता. तसेच आपला संघ जिंकावा म्हणून देशभर प्रार्थना वगैरेही घडवून आणल्या गेल्या नव्हत्या. (घडवून हा शब्द जाणीवपूर्वक वापरला. कारण असे काही केले, की चटकन प्रसिद्धी मिळते, हे माहीत असल्याने अनेक जण मुद्दाम तसे करीत असतात.)

थोडक्‍यात या संघाकडून कोणत्याही अपेक्षा नव्हत्या. अपेक्षांचे ओझे नसल्यानेच हा संघ या स्पर्धेत अतिशय मोकळा-ढाकळा खेळ करीत राहिला आणि खेळाचा आनंद लुटत विजयीही होत गेला. भारतीय संघाच्या यशाचे अनेक प्रकारे विश्‍लेषण करता येईल. अनेक नवोदित; परंतु प्रतिभावंत खेळाडू या संघात होते, सचिन-सौरभ-राहूल ही ज्येष्ठ "त्रयी' संघात नव्हती यांसह अनेक कारणे दिली जात आहेत. परंतु, माझ्या मते कोणत्याही (अवास्तव) अपेक्षेविना "कोरी पाटी' घेऊन खेळण्याचाच घटक महत्त्वाचा आहे. खुद्द कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही ते कबूल केले आहे. आपल्याकडून अनेकांच्या अपेक्षा आल्या, की बाह्य तणाव वाढू लागतो आणि अनेकदा या ताणाखाली दबलो जातो. भारतीय क्रिकेट संघाचेही असेच होत होते. 20-20 क्रिकेट स्पर्धेत हा "बाह्य तणाव'च नाहीसा झाला. त्यामुळे संघ फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करू शकला. त्याचा सकारात्मक परिणाम सर्वांनाच अनुभवण्यास मिळाला.

मात्र, आता एक धोका संभवतो. तो म्हणजे हा संघ यशस्वी झाल्याने पुन्हा एकदा देशातील कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या अपेक्षांचे ओझे (स्वतःचा "टीआरपी' वाढविण्यासाठी क्रिकेटचा "हाईप' करीत त्याला भरपूर प्रसिद्धी देणाऱ्या टीव्ही चॅनेल्समुळे) या संघावर येऊ शकतो!

* * *

भारतीय क्रिकेट संघाच्या ताज्या कामगिरीत एक संदेश दडला आहे. तो म्हणजे ः एखाद्याकडून अवास्तव अपेक्षा बाळगू नका. त्यातून निराशाच हाती येईल. कारण अपेक्षाभंगाचे दुःख मोठे असते. दरवेळेस अपेक्षांची पूर्ती होतेच असे नाही. याचा अर्थ एखाद्याकडून अपेक्षा बाळगायचीच नाही का? जरूर बाळगायला हवी; पण ती अमानवी असता कामा नये. एखाद्याची प्रतिभा, कष्ट करण्याची तयारी, आव्हानांना सामोरे जाण्याची वृत्ती, स्पर्धात्मकता, ताण सहन करण्याची क्षमता आदी अनेक घटक विचारात घेऊनच अपेक्षा करायला हवी. तसेच, अपेक्षांच्या पूर्तीसाठी पोषक वातावरणही निर्माण करायला हवी.

हा संदेश उपयुक्त ठरेल, तो देशातील कोट्यवधी आई-वडिलांना. शंभर कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतात आशा-आकांक्षांवर जगणाऱ्यांचीच संख्या प्रचंड आहे. "आपल्याला जे जमलेले नाही तेआपल्या मुलांना जमावे, आपली स्वप्ने त्यांनी पूर्ण करावीत,' असे बहुतेक सर्व आई-वडिलांना वाटत असते. त्यांच्या साऱ्या आशा-आकांक्षा मुलांवरच असतात. थोडक्‍यात मुलांकडून त्यांच्या मोठ्या अपेक्षा असतात. आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता सर्व मुलांमध्ये असतेच असे नाही. अनेकांना या अपेक्षांचे ओझे वाटू लागते आणि त्या ओझ्याखाली ते दबले जाऊ लागतात. परिणामी जे शक्‍य आहे तेही त्यांना अशक्‍य होते. अशा मुलांचे कोवळे वय होरपळून जाते. अनेकांचे मानसिक संतूलन ढळते. काहीजण टोकाची कृती करतात.

दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालानंतर याचे प्रत्यंतर दरवर्षी येते. आपल्या मुलांची कुवत काय आहे, त्यांचा वैयक्तिक कल काय आहे हे त्यांनी पाहायला हवे. समजा एखाद्याला विज्ञानात गतीच नसेल, त्याऐवजी त्याचे मन साहित्य-कलेत रमत असेल, तर त्याच्याकडून इंजिनिअर होण्याची अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. त्याऐवजी त्याला हव्या त्या क्षेत्रात अभ्यास करण्याची संधी दिल्यास तो चमकदार कामगिरी करू शकतो. थोडक्‍यात "झेपेल इतके; परंतु ओझे होणार नाही' याची काळजी अपेक्षा बाळगता घेतली गेली पाहिजे.

Sunday, September 16, 2007

"सेतुसमुद्रम'चा वाद


माझ्या लहानपणीची एक आठवण. त्यावेळी सोलापुरात भर चौकात मारुतीचे मंदिर होते. मध्येच मंदिर असल्याने लोक त्या मारुतीला "मधला मारुती' म्हणायचे. पुढे रहदारी वाढली आणि वाहतुकीची कोंडी होऊ लागली. मधल्या मंदिराचाच मुख्य अडथळा होता. या चौकातील वाहतूक सुरळीत करायची असेल, तर मंदिर हटवावे लागेल, अशी भूमिका महापालिकेने घेतली. भाविकांचा अर्थातच विरोध; पण पालिकेने भूमिका कायम ठेवली आणि याच चौकात कोपऱ्यात नवीन मंदिर बांधण्याचे आश्‍वासन दिले. प्रथम मंदिर बांधण्यात आले आणि मग आधीच्या मंदिरातील मारुतीचे नव्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. अशा रीतीने तेथील वाहतूक सुरळीत करण्यासाठीचा अडथळा बाजूला करण्यात आला.

हे आठवण्याचे कारण म्हणजे सध्या गाजत असलेला "सेतुसमुद्रम' प्रकल्प. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान असलेल्या पाल्कच्या सामुद्रधुनीतून सागरी कालवा निर्माण करण्याचा हा प्रकल्प. मात्र, रामायणात उल्लेख असलेल्या "रामसेतू'ला यामुळे धक्का बसणार आहे. सीतेला सोडवण्यासाठी लंकेत जाण्याकरिता प्रभू रामचंद्रांच्या मार्गदर्शनाखाली हा पूल बांधण्याता आल्याची गोष्ट आपल्याला माहीत आहेच. या पूलाच्या मागे कोट्यवधी हिंदूंच्या भावना निगडित आहेत. पूल तोडल्यास त्यांच्या भावना दुखावतील, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटना घेत आहेत. त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली असतानाच, "" या पुलाला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याची'' भूमिका केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रकाद्वारे न्यायालयात घेतली. त्याहून कडी म्हणजे ""राम आणि रामायणाबाबात पुरावे नाहीत,'' असे सांगण्यात आले. देशभर प्रक्षोभ उसळल्यानंतर सरकारने प्रतिज्ञापत्रक मागे घेतले; पण यावरून निर्माण झालेला वाद अद्याप संपलेला नाही.

रामायण आपणा सर्वांनाच प्रिय असलेला विषय. रामायण आणि महाभारतातील गोष्टी ऐकतच आपण सारे लहानाचे मोठे झालो आहोत. ही दोन महाकाव्ये "अभिजात साहित्यकृती' आहेतच; पण त्यांचे स्थान त्याही पलीकडे आहे. कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात त्यांना स्थान आहे. या महाकाव्यांतील गोष्टी पुराणातील जरूर आहेत; परंतु मनुष्य स्वभावाचे बारकावे, जीवनातील संघर्ष, तत्त्वज्ञान या साऱ्यांमुळे त्या "कालातीत' आहेत. आजच्या एकविसाव्या शतकातही चपखल बसू शकेल, असे अनेक संदर्भ या महाकाव्यांत मिळतात. म्हणूनच ते केवळ "धार्मिक ग्रंथ' नाहीत. जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे आणि वेगवेगळ्या प्रसंगांत कसे वागावे याचे मार्गदर्शन करणारे ते ग्रंथ आहेत. साहित्यात प्रत्यक्ष जीवनाचे प्रतिबिंब पडते. हे अनुभव जितके सच्चे, जितके वास्तव तितके साहित्य अव्वल दर्जाचे ठरते. या प्रकारच्या साहित्याला काळाची मर्यादा नसते. एक प्रकारे ते "अक्षर' म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही, असे वाङ्‌मय असते. रामायण आणि महाभारत ही अशी "अक्षर वाङ्‌मये' आहेत. त्यामुळेच "राम आणि रामायण यांच्याबाबत पुरावा देता येत नाही,' असे म्हणणे धाडसाचे ठरते. राम आणि रामायणाला ऐतिहासिक आधार नाही, हे म्हणणे म्हणूनच तपासले पाहिजे.

मात्र, प्रतिज्ञापत्रकातील हे वाद्‌ग्रस्त विधान सरकारने मागे घेतले आहे. आता जे होत आहे, ते सत्तेसाठीचे राजकारण आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंनी भावना भडकावण्याचे काम केले जात आहे. यामुळे मूळ सेतूसमुद्रम प्रकल्पाचा हेतू मागे राहिला आहे. वास्तविक भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान अशा प्रकारचा प्रकल्प राबविता येऊ शकेल, याची जाणीव दीडशे वर्षांपूर्वी ए. डी. टेलर या ब्रिटिश नौदल अधिकाऱ्याला झाली होती. पुढे स्वातंत्र्यानंतर 1955 मध्ये केंद्र सरकारने एक समिती नेमली होती. मात्र, काहीही झाले नाही. अखेर 2000-01 च्या अर्थसंकल्पात सुमारे साडेचार कोटी रुपयांची तरतूद या प्रकल्पासाठी करण्यात आली. या प्रकल्पाला आज विरोध करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कालावधीतच तो मंजूर करण्यात आला. या प्रकल्पामुळे भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम किनाऱ्यांदरम्यानच्या वाहतुकीसाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. कारण सध्याचा मार्ग हा श्रीलंकेला वळसा घालणारा आहे. हा कालवा झाल्यास 424 नॉटिकल मैल म्हणजे 780 किलेमीटर अंतर कमी होणार आहे. त्यामुळे तीस तासांचा वेळ आणि अर्थातच इंधन आणि पैसा यांची बचत होणार आहे. शिवाय सागरी व्यापार वाढणार आहे. थोडक्‍यात हा एक व्यवहार्य आणि उपयुक्त प्रकल्प आहे. केवळ "रामसेतू'ला धक्का बसतो म्हणून त्याला विरोध करणे अव्यवहार्य ठरते. "रामसेतू'ला धक्का बसल्याने भाविकांच्या भावनांना तडा जाईल, असे म्हटले जाते; परंतु त्यांच्या भावना इतक्‍या तकलादू नक्कीच नाहीत. "मधला मारुती' हलविल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. भाविकांचा विरोध क्षणिक होता; पण व्यवहार्य तोडगा काढल्यावर तो मावळला. या प्रकल्पाच्या बाबतीतही असे करता येईल. या प्रकल्पावर पर्यावरणाच्या दृष्टीनेही आक्षेप घेतले जात आहेत. विशेषतः तेथील सागरी जीवसृष्टीवर विपरित परिणाम होईल, असे म्हटले जाते. या साऱ्यांचा अभ्यास करून मार्ग नक्कीच काढता येईल; पण त्यासाठी प्रकल्पच नको, अशी भूमिका घेणे हे बुरसटलेल्या विचारांचे लक्षण आहे. पुराणावर श्रद्धा जरूर हवी; पण आपले विचार पुरोगामी आणि विकासाभिमुखच हवेत.

Sunday, September 9, 2007

वैयक्तिक आणि सार्वजनिक

आपल्या स्वतःच्या स्वच्छतेची आपण खूप काळजी घेत असतो. दररोज स्नान करतो. तऱ्हेतऱ्हेच्या साबणांचा वापर करतो. डिओडरंट्‌स, सेंट यांचाही वापर करीत असतो. चांगले कपडे घालतो. नेटका दिसण्याचा आपला प्रयत्न असतो. जी गोष्ट वैयक्तिक स्वच्छतेची तीच घराचीही. आपले घर स्वच्छ असावे, छान दिसावे याची काळजीही आपण घेत असतो. हॉलच नव्हे, तर बेडरूमच्या सजावटीकडेही आपण लक्ष देत असतो. थोडक्‍यात स्वतःच्या आणि घराच्या स्वच्छतेबाबत आपण कमालीचे दक्ष असतो. स्वच्छतेबद्दलची आपली ही दक्षता स्वतःपासून सुरू होते आणि घरापर्यंत येऊन थांबते. आपली सोसायटी, आपला परिसर, आपले शहर, आपला देश स्वच्छ असावा, यासाठी मात्र हवी तितकी दक्षता आपण घेत नाही. आपला परिसर किंवा शहर स्वच्छ असू नये, असे आपल्याला वाटत नाही, असे नाही; परंतु ते अशा "वाटण्यापुरताच' मर्यादित राहते. ""परिसर किंवा शहर स्वच्छ करण्याचे काम माझे नाही, इतरांनीही पुढाकार घ्यावा, '' अशी आपली भावना असते. सर्वांचीच ती भावना असल्याने कोणी पुढाकार घेत नाही. ज्यांचे हे काम आहे, ती महापालिका या साऱ्याला अपुरी पडते. मग परिसर, शहर अस्वच्छच राहते. अगदी विद्रूप होऊन जाते.
आपल्यापैकी बहुतेकांना आई-वडलांचा धाक असतो. त्याचबरोबर आजी-आजोबा किंवा काका-मामा या नजीकच्या वडिलधाऱ्या नातेवाईकांचाही धाक असतो. घरात त्यांनी लावलेली शिस्त पाळण्याचा आपण कसोशीने प्रयत्न करतो. त्यांच्या मनाविरुद्ध करणे शक्‍यतो टाळतो. त्यांचा अवमान होईल, अशी कोणतीही कृती आपण करत नाही. सर्वच शिक्षकांबद्दल आपल्या मनात अशी भावना असतेच असे नाही; पण काही शिक्षक आपल्या आदराला नक्कीच पात्र ठरलेले असतात. शिकत असताना त्यांची शिस्त पाळण्याचाही प्रयत्न आपण करीत असतो. अगदी मनापासून नसली, तरी दंडाच्या भीतीपोटी आपण कॉलेजची शिस्तही पाळत असतो. पुढे नोकरीच्या ठिकाणी तेथील शिस्त पाळतो. याशिवाय स्वतःची अशी एक शिस्त आपण घालून घेतलेली असते. तीही पाळत असतो. वैयक्तिक आयुष्यात अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर शिस्त पाळणारे आपण सारे सार्वजनिक शिस्तीच्या बाबतीत मात्र बेफिकीर असतो. वाहतुकीचा "सिग्नल' हा मोडण्यासाठीच आहे, अशी आपली समजूत असते. चौकात पोलिस असला, तर "लाल दिवा' असल्यास कसेबसे थांबतो; पण तो नसला की सिग्नल तोडून सुसाट सुटतो. या बेशिस्तीमुळेच वाहतुकीची कोंडी होत असते. रांगेचा तिटकारा असल्याने ती शक्‍यतो मोडण्याचाच आपला प्रयत्न असतो.
वैयक्तिक आयुष्यात आपण काटकसरी असतो. पै अन्‌ पैची बचत करत असतो. घरात असताना विजेची बचत करत असतो. म्हणजे बेडरूममध्ये कोणी नसल्यास तेथील दिवा बंद ठेवतो. रात्री झोपताना न चुकता फ्रीज बंद करतो. परंतु, दिवसाही सोसायटीतील दिवे चालू असले, तरी ते बंद करण्याची तसदी आपण घेत नाही. हीच गोष्ट कार्यालयातील. आपले काम संपल्यावर आपल्या खोलीत अन्य कोणी नसेल, तर दिवे बंद करायला हवेत; मात्र ते शिपायाचे काम असल्याने आपण तसेच निघून जातो. घरच्या फोनवरून वा मोबाईल फोनवरून बोलताना मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी बिलाचा विचार असतो. कार्यालयातील फोनवर बोलताना हा विचार जवळ-जवळ नसतो. वैयक्तिक मालाबद्दल काळजी करणारे आपण सार्वजनिक मालमत्तेचा अजिबात विचार करीत नसतो. आपले स्वातंत्र्य आपल्याला खूप प्रिय असते आणि त्यात काही गैर नाही; परंतु आपल्या स्वातंत्र्याबद्दल आग्रही असणारे आपण अनेकदा दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या संकोच करीत असतो. खासगी जीवनात भित्रे असणारे अनेक जण समूहात गेले, की शूर वीर होतात. एरवी मुकाट्याने गप्प बसणाऱ्यांना कळपात गेले, की वाचा फुटते!
थोडक्‍यात आपला वैयक्तिक चेहरा आणि सार्वजनिक चेहरा वेगळा आहे. हे दोन्ही चेहरे परस्परविरोधी आहेत. असे का व्हावे? सामाजिक मूल्यांपेक्षा कौटुंबिक मूल्यांनाच अधिक महत्त्व दिल्याने असे होत असावे काय? स्वतःशी, कुटुंबाशी, शाळा-महाविद्यालय आणि नोकरी करीत असलेल्या संस्थेशी जशी बांधिलकी (तीही उतरत्या क्रमाने!) निर्माण झाली, तशी समाजाबद्दल निर्माण झालेली नाही, हा याचा अर्थ आहे का? सामाजिक जबाबदारीचे भान आपल्याला नाही, असे म्हणता येईल काय? "सामूदायिक जीवन' हा विषय शाळेत अभ्यासाला होता; परंतु परीक्षेला नव्हता. त्याचा तर परिणाम नाही ना? समाजसेवा, कार्यानुभव, स्काऊट हे विषय शाळेत "साईडलाईन'ला होते, त्याचाही हा परिणाम आहे काय? आपण सारेच कमालीचे स्वार्थी आणि आत्ममग्न असल्याने असे होत असावे काय?
अशी अनेक प्रश्‍ने उपस्थित करता येतील; पण त्याचे उत्तर देण्याचे धाडस आपल्यात आहे काय? सर्वांच्या बाबतीत नसले, तरी समाजातील 95 टक्के लोकांच्या बाबतीत हे लागू असल्याने उत्तर आपल्यालाच द्यावयाचे आहे. ते देऊन प्रत्येकाने स्वतःत बदल केला, तरच भारत महान होईल! मग "मेरा भारत महान' असे म्हणण्याचीही गरज भासणार नाही.

Wednesday, September 5, 2007

संधीची समानता

विविध उद्योगांच्या मुख्याधिकाऱ्यांचे (सीईओ) वेतन गलेलठ्ठ असून, ते कमी झाले पाहिजे, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मांडल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. जास्त पैसे कमविण्यात गैर काय आहे, असा प्रश्‍नही पंतप्रधानांना विचारण्यात आला. "सीईओं'च्या वेतनाचा मुद्दा फक्त भारतातच गाजतो आहे, असे नाही. अमेरिकेसारख्या "भांडवलवादी' देशातही तो चर्चेत असतो. अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी सिनेटमध्ये केलेल्या भाषणाला उत्तर देताना व्हर्जिनाचे सिनेटर जेम्स वेब यांनी हा मुद्दा मांडला होताः ""माझे शिक्षण संपले त्या वेळी एखाद्या कॉर्पोरेट "सीईओ'चे वेतन हे त्याच्या कंपनीतील कामगाराच्या सरासरी वेतनाच्या वीसपट होते. आता ते चारशेपट झाले आहे. म्हणजे हा कामगार सव्वा वर्षात जितकी रक्कम कमावतो, तितकी रक्कम "सीईओ' एका दिवसात कमावतो!'' "सीईओ' आणि साधारण कामगार यांच्या वेतनातील तफावत विषमता स्पष्ट करणारे असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले होते. सिनेटर वेब यांनीही हाच मुद्दा वेगळ्या शब्दांत मांडला आहे.
भारतातील विषमतेबद्दल नवीन काही सांगायला नको. एकीकडे भूकबळी पडताहेत, तर दुसरीकडे "फिटनेस सेंटर्स' वाढताहेत. एकीकडे मॉल्स वाढताहेत, तर दुसरीकडे छोट्या व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे. विरोधाभासांची ही यादी आणखी वाढवता येईल. थोडक्‍यात, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी रुंदावत आहे. म्हणूनच "इंडिया' आणि "भारत' असे दोन वेगळे देश येथे असल्याचे बोलले जाते. श्रीमंत अशा अमेरिकेतही दोन वेगळे देश असल्याचे बोलले जात आहे. डेमॉक्रेटिक पक्षाकडून अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले जॉन एडवर्डस सध्या हाच विचार मांडत आहेतः ""अमेरिका हा एकच देश नाही. येथे एक अमेरिका अशी आहे, की जी खूप काम करते, काबाडकष्ट करते. आणि दुसरी अमेरिका या कष्टांमुळे निर्माण झालेल्या पैशावर चैन करते.'' "सीईओं'च्या वेतनाचाच मुद्दा ते अप्रत्यक्षपणे मांडत आहेत.
अमेरिकेतील या विषमतेवर तेथील "सिटी जर्नल' या विख्यात नियतकालिकाने उद्‌बोधक चर्चा घडवून आणली आहे. विषमतेची कारणे आणि तिचे निराकरण एवढ्यापुरतीच ही चर्चा मर्यादित नाही. विषमता आणि समाधान-आनंद-सुख यांचे काही संबंध आहे काय, याचे विश्‍लेषणही त्यात करण्यात आले आहे. आर्थर ब्रुक्‍स या लेखकाच्या मते समाधान हे उत्पन्नांतून निर्माण होणाऱ्या विषमतेवर अवलंबून नाही. मात्र, उत्पन्नासाठीच्या वरच्या शिडीत चढण्याची संधीच मिळत नसेल, तर असमाधान निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. तेथेही श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहेत आणि गरीब आणखी गरीब. तेथील "नॅशनल ओपिनियन रिसर्च सेंटर'तर्फे सर्वसाधारण सामाजिक पाहणी (जीएसएस) केली जाते. विषमता कशा प्रकारे वाढत आहे, हे या पाहणीतून स्पष्ट होत आहे. म्हणूनच जॉन एडवर्डस यांच्यासारखे नेते, "सीईओं'च्या वेतनावर मोठा कर लागू करावा आणि त्यातून जमा होणाऱ्या रकमेचे (गरिबांत) फेरवाटप केले जावे, असे म्हणत आहेत. तार्किकदृष्ट्या हा विचार पटणारा आहे; पण कमी वेतन मिळविणाऱ्या कामगारांना याबाबतचे प्रश्‍न विचारल्यानंतर आलेले उत्तर वेगळे आहे. "सीईओं'च्या गलेलठ्ठ वेतनाबद्दल या कामगारांना फारसे आश्‍चर्य वाटले नाही. मात्र, आपली मुलेही असेच "सीईओ' (किंवा चक्क बिल गेट्‌स) व्हावेत, अशी इच्छा बहुतेकांनी व्यक्त केली.
याबाबतची पाहणीही करण्यात आली आहे. त्यावरील निष्कर्षाच्या आधारे ब्रुक्‍स म्हणतात, ""सर्वसाधारण अमेरिकी जनतेला आर्थिक विषमतेबद्दल चिंता वाटत नाही; परंतु आर्थिक संधींबाबतची विषमता त्यांना खटकते. त्यामुळे विषमतेचे निर्मूलन करायचे असेल, तर संधी वाढविणे गरजेचे आहे. तसे न करता विषमतेबद्दल बोलत राहण्याने समस्या आणखी गंभीर होत जाईल.''"जीएसएस'च्या पाहणीनुसार, विषमता आणि समाधान-आनंदीपणा यांच्यात काहीही नाते नाही. मात्र, जीवनशैली उंचावण्याची संधी मिळाल्यास संबंधित व्यक्ती (आणि कुटुंब) अधिक समाधानी होते. त्यामुळे समाजाच्या वरच्या स्तरांत जाण्याची शिडी असणे गरजेचे आहे. ती नसल्यास विषमता आणखी वाढू शकते. या विषमतेमुळे आणि वर जाण्याची संधी नसल्यामुळे लोक असमाधानी होऊ शकतात. संधीची समानता हाच कळीचा मुद्दा आहे आणि भारतातील विषमता दूर करण्यासाठीही तोच लागू पडणारा आहे.
(पूर्वप्रसिद्धी - "सकाळ', ता. 4 सप्टेंबर 2007)

Sunday, September 2, 2007

गोष्ट मध्यमवर्गीयांची

मध्यमवर्ग ही अतिशय ढोबळपणे वापरली जाणारी संज्ञा आहे. भारतासारख्या देशात या मध्यमवर्गाची विशिष्ट अशी व्याख्याही नाही. श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील मोठा वर्ग म्हणजे मध्यमवर्ग, असे म्हणता येईल. मात्र, उत्पन्नानुसार या वर्गाचेही कनिष्ठ-, मध्यम-, उच्च- आणि नवश्रीमंत असे किमान चार स्तर तरी पडतात. या चारही स्तरांत काही साम्यस्थळे आहेत, तर काही विरोधाभासही आहे. त्यामुळे मध्यमवर्ग हा एक एकजिनसी समाज असे गृहीत धरून चालणार नाही. भारतातील मध्यमवर्ग हा "मोनोलिथ' नाही.
मध्यमवर्गाचा विषय चर्चेला घेतला, कारण अलीकडेच याबाबतचा एक प्रदीर्घ लेख वाचण्यात आला. "प्रॉस्पेक्‍ट' नावाच्या मासिकात चक्रवर्ती राम प्रसाद यांनी हा लेख लिहिला आहे. "जागतिकीकरण, खासगीकरण आणि माहिती तंत्रज्ञान क्रांती यांमुळे भारतातील मध्यमवर्गाला एक मोठी संधी मिळाली आणि त्यामुळे या वर्गाची भरभराट होत आहे; परंतु राजकीयदृष्ट्या तो उदासीन होत आहे. जोपर्यंत तो राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सजग होत नाही, तोपर्यंत भारतातील विकासप्रक्रिया एकांगीच राहील,' असे लेखकाने म्हटले आहे. या म्हणण्यात तथ्य आहे. कारण एरवी प्रसारमाध्यमांतून आपली मते उच्चरवाने मांडणारे सुशिक्षित मध्यमवर्गीय प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी सुटी साजरी करीत असतात. कोणीही सत्तेवर आला, तरी आपल्या हितांना धक्का बसणार नाही, अशी त्यांची धारणा असावी आणि ती वृथा नाही. पण, हा वर्ग आपल्याच कोशात गुरफटत गेल्यास, प्रसाद म्हणतात त्याप्रमाणे, भारतात एकीकडे "विकास', तर एकीकडे "भकास' असेच चित्र राहणार, हे नक्की. म्हणजेच विषमता वाढत जाणार. कोणत्याही देशाचा कणा म्हणजे हा मध्यमवर्ग असतो. म्हणूनच मध्यमवर्गीयांकडे आशेने, अपेक्षेने पाहिले जाते आणि त्याचबरोबर समाजातील अनेक दोषांचे खापरही त्यांच्यावरच फोडले जाते. अशा रीतीने मध्यमवर्गाकडून "हीरो'च्या अपेक्षेने पाहिले जाते. त्यात तो अपयशी ठरला, की त्याला "व्हिलन' ठरविले जाते. सध्या भारतात नेमके हेच घडत आहे. मध्यमवर्गीय धाडसी होत आहे. तो शेअर बाजारात पैसा गुंतवत आहे, स्वतंत्र उद्योग किंवा व्यवसाय करू पाहत आहे, आयुष्यभर पैसा जपून ठेवण्याची पिढीजात वृत्ती सोडून खर्चिक होत आहे, कर्ज काढून घर तर घेतोच आहे; पण मोटारही घेतोय आणि परदेशी पर्यटनासही जात आहे. ज्या प्रायव्हेट कॉलेजेसना तो पूर्वी नाके मुरडत होता, तेथे लाखो रुपये खर्चून आपल्या मुलांना शिक्षणाला पाठवत आहे. थोडक्‍यात आपली स्वतःच बाजारपेठ तो स्वतःच वाढवत आहे आणि म्हणूनच बड्या भांडवलदारी कंपन्या परदेशांतून भारतात येत आहेत.
तीस कोटींची ही भली मोठी बाजारपेठ ताब्यात यावी म्हणून असेल, किंवा विकासदर सातत्याने आठ टक्‍क्‍यांवर ठेवल्यामुळे असेल, किंवा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून असेल, "एक उगवती महासत्ता' म्हणून अमेरिकेसह अनेक देश भारताचा उल्लेख करीत आहेत. यामुळे येथील मध्यमवर्गीयांचा "इगो'ही छान सुखावतो आहे. आर्थिक आघाडीवर भारताची आगेकूच होत असली, तरी विषमता वाढते आहे. मध्यमवर्गीयांइतकेच म्हणजे तीस कोटी लोक दारिद्य्ररेषेच्या खाली आहेत. आर्थिक विकासामुळे हे प्रमाण कमी होईल आणि हळूहळू हे गरीबही मध्यमवर्गीयांच्या गटात जाऊन बसतील, असा सिद्धांत काही तज्ज्ञ मांडतात. तो खराही आहे; पण ज्या "कल्याणकारी राज्या'च्या संकल्पनेमुळे येथील लाखो गरीबांचे मध्यमवर्गात रुपांतर झाले, त्या संकल्पनेलाच आता हद्दपार केले जात आहे. मग कोणती शिडी घेऊन गरीब लोक मध्यमवर्गात जाणार?
"कल्याणकारी राज्या'च्या धोरणामुळे अनेक गरीबांना विशेष खर्च न करता थेट विद्यापीठात वा "आयआयटी'त जाऊन उच्च शिक्षण घेता आले, आरोग्य सेवा घेता आल्या. आज या साऱ्या बाबींतून सरकार माघार घेत आहे. "उच्च शिक्षण ही आमची जबाबदारीच नाही,' अशी भूमिका सरकार घेत आहे. मध्यमवर्गीयालाही ही आपली गरज वाटत नाहीए. कारण तो आता सुस्थित झाला आहे. एके काळी तो शुल्कवाढीच्या विरोधात आंदोलने करायचा. रेशन, रॉकेल व्यवस्थित मिळावे म्हणून रस्त्यावर यायचा. झोपडवस्तीतील गरीबांच्या दुःखाने कळवळायचा. त्यांना सहानुभूती दाखवायचा. आज तो एखाद्या "मॉडेल'च्या वा सिनेनटीच्या आत्महत्येमुळे कळवळतो, एखाद्या सेलिब्रेटीवरील अन्याय दूर व्हावा म्हणून "एसएमएस पोल'मध्ये भाग घेतो; परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्येने त्याचे काळीज चर्र होत नाही. त्याला वेध लागले आहेत ते "प्रगत आणि महासत्ता' झालेल्या भारताचे. एकदा का भारत महासत्ता झाला, की सारे प्रश्‍न सुटणार आहेत!
आता ज्या मध्यमवर्गाचा उल्लेख मी करतोय तो उच्च मध्यमवर्गीय आहे किंवा नवश्रीमंत तरी आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय अजूनही संवेदनशील आहे, जुन्या पुराण्या विचारांना, नैतिकतेला, सिद्धांतांना चिकटून आहे. पण, या साऱ्यांचे "ओझे' नवश्रीमंतांनी केव्हाच झुगारून दिले आहे आणि उच्च मध्यमवर्गीय झुगारून देण्याच्या मार्गावर आहेत. दुर्दैवाने याच नवश्रीमंतांच्या आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या हातात माध्यमे असल्याने त्यांमधील चित्रणही देशाच विकासप्रक्रियेप्रमाणेच एकांगी होत आहे.