Tuesday, July 31, 2007

श्रमाचे मोल

* बॅंकेत, विमा कंपनीत किंवा तत्सम संस्थेत आठ तास अगदी आरामात (आणि कुचाळक्‍या करत) कारकुनी करणारी व्यक्ती दरमहा किमान आठ हजार रुपये कमावते.* सरकारी महाविद्यालये किंवा विद्यापीठांत एका आठवड्यात वीस-एक "लेक्‍चर्स' घेणारे (म्हणजेच दरवर्षी त्याच-त्या नोट्‌स उतरवून देणारे) "प्राध्यापक' दरमहा किमान बारा हजार रुपये कमावतो.* पहाटे चार वाजता उठून हातात झाडू घेऊन तुमच्या-आमच्या सारख्या "सुशिक्षित पांढरपेशी' समाजाने केलेली घाण साफ करण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना दहा-एक तास घाणीत काम करून महिन्याला मिळतात जेमतेम चार ते पाच हजार रुपये. जोडीला अनेक रोग!* चार किंवा पाच जणांचे कुटुंब असलेल्या घरात धुणी-भांडी करणाऱ्या बाईला दरमहा सहाशे ते आठशे रुपये. शिवाय हक्काची सुटी नाही. उन्हा-तान्हात कष्टाचे काम करणाऱ्यांना अशीच क्षुल्लक रक्कम कमाई म्हणून मिळते.* * *भारतात श्रमाचे मोल काय आहे हे स्पष्ट करण्यासाठीची ही उदाहरणे. आपल्याकडे शारीरिक श्रमापेक्षा कारकुनी खर्डेघाशीला किंवा बाश्‍कळबाजीला अधिक मोल आहे. आणि म्हणूनच मुलांना अभ्यासात गोडी असो वा नसो शिकविण्याचा अट्टाहास धरला जातो. आपल्या मुलाला गणित किंवा अन्य विषयात पैकीच्या पैकी गुण पडले, हे पालक अभिमानाने सांगतात; मात्र तो चांगले चित्र काढत असेल किंवा त्याला विशिष्ट खेळात गती असेल, तर त्याबद्दल तेवढा अभिमान बाळगला जात नाही. आपल्याकडील बहुतेक पालक मुलांच्या अभ्यासाकडे काळजीपूर्वक लक्ष देत असतात आणि "अभ्यासाला बस,' असा लकडा नेहमी लावत असतात. मात्र, या मुलाने स्वतःचे कपडे स्वतः धुवावे, घरातील केरकचरा काढावा, अधून-मधून स्वयंपाक करावा, असा आग्रह धरणारे पालक अभावानेच आढळतील. याचे कारणही सोपे आहे. एकतर या कामांसाठी अतिशय स्वस्तात मोलकरीण उपलब्ध असते किंवा खुद्द पालकच (म्हणजे आई) ही कामे करत असतात. आपल्या मुलाने शिकून "साहेब' व्हावे, अशी इच्छा असल्याने ही कामे ते मुलांना सांगत नाहीत. त्यामुळे मुलांवर श्रमांचे संस्कार होतच नाहीत. ज्यांच्यावर अजिबात श्रमसंस्कार झाले नाहीत, अशी मुले मोठे झाल्यानंतर श्रमाचे मोल कसे जाणणार? ही मुले नोकरी मिळेपर्यंत शिकत राहतात. बीए किंवा बीएस्सी होतात. नोकरी न मिळाल्यास एमए किंवा एमएस्सी करतात. नंतर आणखी कोणतातरी कोर्स करतात; पण श्रमाचे कोणतेही काम करण्यास टाळाटाळ करतात. आपल्या श्रमाची किंमत होणार नाही हे कारण त्यामागे आहेच; पण त्या श्रमासाठीची कौशल्येही त्यांच्याकडे नसतात. वास्तविक भारतीय संस्कृतीत श्रमाचे मोल मोठे आहे. प्राचीन वाङ्‌मयात आणि संतांच्या साहित्यात श्रमाचा उल्लेख अतिशय आदराने केलेला आढळतो. मात्र, पुस्तकी शिक्षणाचा प्रसार जसा होत गेला तसा श्रमाबद्दल आदर कमी होत गेला. याचा अर्थ शिक्षण वाईट असते हा नाही. शिक्षण महत्त्वाचे आणि मोलाचेच आहे; परंतु पुस्तकी शिक्षणाला व्यवहाराची, मानवाकडील अन्य कौशल्यांची आणि श्रमाची जोड दिलीच पाहिजे. मानवाकडे एकूण आठ प्रकारच्या प्रज्ञा असतात. त्यांपैकी भाषिक आणि तार्किक गणितावरच आपण भर देतो. श्रमाशी आणि कलेशी संबंधित असलेल्या अन्य प्रज्ञांकडे दुर्लक्षच करतो. असे होत असल्यानेच सुशिक्षित बेरोजगारांची, श्रमाची उपेक्षा आणि हेटाळणी करणाऱ्यांची मोठी फौज आपल्याकडे तयार झाली आहे. ती आहे तोपर्यंत सर्जनशील, उत्पादनशील कामे आपण करू शकणार नाही. त्यामुळे श्रमसंस्कृती रुजविण्याची आज गरज आहे.

5 comments:

Anonymous said...

shramalach kay, Bharatat manasalahi kimmat nahi

A woman from India said...

Very good article. Many of our failures are attributed in not investing enough in creative arts education.

Unknown said...

खूप छान. पण हे समाजाला पटवून कोण देणार? श्रमाचे मोल आईबापांनाच पटले नसेल तर ते मुलांना काय सांगणार?

Anonymous said...

If market economy start respecting labour, then and then only it will earn respect and money by whole society.

Anonymous said...

Dear Shridhar,

I liked the issue you have raised and particularly how today's education system makes a graduate good for nothing. Also, I fully agree with you when you say that our education system is emphasizing on only textual and logical (sastric) knowledge.

But I strongly disagree with 'bharatiya Sanskrutiteel shramache mol' etc.

Our culture, developed out of and along with a strong caste-system, is based on inequality and hence the idea that physical labour is not dignified is very prominent. It is rooted into our hearts that soiling our hands is undignified. The caste system has shown the benifits of not working physically and hence everyone tries to keep herself/himself out of physical labour so that this can become a way to upward mobility.

We are so used to textual knowledge that we can't even think of refering to our own experiences. Even in your writing, you have refered to 'sant wangmay' etc. which are essentially texts. This tradition of textual knowledge is reproducing inequality inspite of so much of population getting education.

I thnik schools can definitely TEACH dignity of labour but we need strong pressure groups and political will. This is next to impossible because both (pressure groups as well as politicians) comprise of those who want to keep themselves away from physical labour.

......kishore