Thursday, July 26, 2007

प्रतीकात्मक लोकशाही

एक मराठी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान होण्याचे समस्त मराठीजनांचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. प्रतिभाताई पाटील या केवळ पहिल्या मराठी राष्ट्रपती नाहीत, तर पहिल्या महिला राष्ट्रपतीही आहेत. देशातील महिलांच्या सक्षमीकरणाचे हे एक प्रतीक असल्याचे मत कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांची उमेदावारी जाहीर करतानाच म्हटले होते. इंदिरा गांधीही दोन वेळा पंतप्रधान होत्या. त्यांनाही महिला सक्षमीकरणाच्या प्रतीक म्हणायला हवे. याच न्यायाने मावळते राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना मुस्लिम सक्षमीकरणाचे आणि त्यापूर्वीचे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांना दलित सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणायला हवे.
प्रतीक तर खरेच. लोकशाहीत प्रतीकांना फार महत्त्व असते. "लोकांनी लोकांसाठी राबविलेले राज्य' खऱ्या अर्थाने लोकांचे करायचे असेल, तर समाजातील सर्व घटकांना सत्तेत वाटा आणि निर्णयप्रक्रियेत सहभाग मिळायला हवा. वर्षानुवर्षे ज्यांना माणूस म्हणून वागविले गेले नाही, ज्यांचे शोषण केले गेले, ज्यांच्या वाट्याला केवळ उपेक्षाच आली, अशांना समतेने वागवत, समानतेची संधी देत सत्तेत भागीदार करून घेणे हे सामाजिक प्रगतीचे लक्षण आहे. अशी संधी लोकशाहीद्वारे मिळत असल्याने ही शासन व्यवस्था अन्य व्यवस्थेपेक्षा चांगली ठरते. एक समाज म्हणून, समाजातील विशिष्ट घटक म्हणून प्रत्येक समूदायाला आशा-आकांक्षा असतात. राजकारण, उद्योग, नोकरशाही, शिक्षण, अर्थकारण, समाजकारण, सांस्कृतिक व्यवहार.. या साऱ्यांमधील सत्तास्थानापर्यंत पोचण्यासाठी ऊर्जा या आकांक्षेतून निर्माण होत असतात. विशिष्ट समाजघटकातील एखादी व्यक्ती- मग ती पुरूष असो वा स्त्री- सर्व शिड्या चढून सर्वोच्च सत्तास्थान काबीज करते, तेव्हा त्या साऱ्या समाजघटकाला आकांक्षापूर्तीचा आनंद होत असतो (प्रतिभाताई पाटील या "मराठी' राष्ट्रपती असल्याने महाराष्ट्राला झालेला आनंद याच प्रकारचा आहे) आणि उर्वरित समाजघटकाला प्रेरणा मिळते, त्यांच्यातील ऊर्मी आणखी जागृत होते. त्यामुळेच लोकशाही व्यवस्थेत प्रतीक एकप्रकारे उत्प्रेरकाचे काम करीत असतात.
पण, ही प्रतीके केवळ प्रतीके म्हणूनच राहणार असतील, तर ते साऱ्या समाजाच्या प्रगतीसाठी घातक ठरते. सत्तरच्या दशकात इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. त्यावेळी देशातील महिलांची जी स्थिती होती, तीच तीस वर्षांनंतरही कायम असेल, तर महिलांचे सक्षमीकरण झाले असे कसे म्हणता येईल? आज अनेक क्षेत्रांत महिला आत्मविश्‍वासाने वावरत आहेत, नोकरी-उद्योग यांमध्ये त्यांचा सहभाग वाढत आहे. महिलांची स्थिती सुधारत असल्याचे मत याकडे पाहून बनविता येईल. काही प्रमाणात ते खरेही ठरेल; पण त्यानंतर अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. महिला प्रगत होत असतील, स्वयंपूर्ण होत असतील, तर देशात स्त्री जन्माचा आनंद का साजरा केला जात नाही? दर हजार पुरुषांमागे स्त्रीचे प्रमाण का घटके आहे? औद्योगिकदृष्ट्या आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आदी राज्यांत, स्त्री भृणहत्या का केली जाते? पंजाबमध्ये तर मुलींचे प्रमाण (हजार मुलांमागे) 750 पर्यंत खाली का आली आहे?
अलीकडेच जाहीर झालेल्या कुटुंब आरोग्य अहवालातील आकडेवारी तर अधिक बोलकी आहे. आजच्या आधुनिक, तंत्रज्ञानाच्या युगातही देशातील 45 टक्के मुलींची लग्ने अल्पवयात (म्हणजे त्यांच्या वयाला अठरा वर्षे पूर्ण होण्याच्या आत) होत असल्याचे या अहवालात स्पष्ट म्हटले आहे. असे फक्त खेड्यात घडते, शहरात सहसा होत नाही, असा युक्तिवाद यावर करता येईल; पण तोही चुकीचा ठरेल. अठरा वर्षांच्या आत मुलीचे लग्न करण्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक (म्हणजे 53 टक्के) आहे हे खरे; पण शहरी भागातही हे प्रमाण 28 टक्के आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या "बीमारू' राज्यांत हे प्रमाण 60 टक्‍क्‍यांपर्यंत आहे; पण महाराष्ट्र आणि कर्नाटकातही ते फार कमी नाही. या (तुलनेने) प्रगत राज्यांत हे प्रमाण 30 टक्के आहे. गरोदरपणा, मातेचे आरोग्य, बालमृत्यू आणि कुपोषण हे सारे परस्परांशी संबंधित मुद्दे आहेत. आपल्याला मूल हवे की नको, याचा निर्णय घेण्याचा अधिकार भारतातील बहुतेक महिलांना नाही. अनेकदा महिलांवर मातृत्व लादले जाते. भारतातील मातामृत्यूदर प्रगत देशांपेक्षा वीस पटीने अधिक आहे. महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल बोलले जात आहे; पण मुलगी कितीही शिकलेली असो, कितीही सुंदर असो तिच्या लग्नासाठी "हुंडा' हा द्यावाच लागतो. हुंड्याचे ही (कु)प्रथा कमी होण्याऐवजी वाढतच चाललेली आहे. साक्षरता, आरोग्य आदी अनेक निकषांवर महिलांची स्थिती फारशी चांगली नसल्याचेच स्पष्ट होते.
अशा स्थितीत प्रतिभाताई पाटील यांना महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणणे कितपत योग्य ठरते? लोकशाही व्यवस्थेत राजकारण अपरिहार्य असते आणि त्यासाठी डावपेच लढवावे लागतात. प्रतिभाताईंची उमेदवारी ही देखील याच डावपेचातून पुढे आली आहे. त्यामुळे फार मोठी क्रांती केल्याचा आव सोनिया गांधी यांनी आणू नये. पण, या निमित्ताने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस गंभीर प्रयत्न झाले, तर चांगलेच आहे. प्रतिभाताईंनीही आपल्या भाषणात याचा उल्लेख केला आहे. ते प्रत्यक्षात यायला हवे. अन्यथा आपली लोकशाहीच प्रतीकात्मक होऊन बसेल.

5 comments:

Anonymous said...

We have witnesed the political heavy weights too cant solve the problems of the country. Then can we expect the issues will be solved by the `political compulsions` on the support of these heavy weights...???
Pratibhtai may be well respected and has to be respected as a first woman president but it is not true that she will get sucess to solve the probles she is preaching of, facing by the women of the country. Lets not expect unpracticle as it has proved in the past as big faliure.
A good topoic to be discussed...

Unknown said...

ही कसली प्रतिकात्मक लोकशाही? प्रतिभाताई पाटलांना उमेदवारी देताना एवढे थोर विचार थोडेच असणार 'त्यांच्या' नेत्यांच्या मनात? सगळं सोयीचं राजकारण. मग त्याला काहीतरी नावं द्यायची..प्रतिकात्मक लोकशाहीसारखी...आपणच उगाच अस्वस्थ होतो, लोकशाही वाचविण्याचा ठेका घेतल्यासारखं!

Anonymous said...

मित्रा कमी लिही रे...किती लिहितोस..दम लागतो वाचताना..मते चांगली असली तरीही ती फास्ट फुडसारखी वाचून लवकर संपली पाहिजेत...

Anonymous said...

Friend it will better if you can post small pieces of writing in early stage. Then go in details. otherwise you always ready to received demand for FAST FOOD.
By the way Article was good but it was posted very late.

Anonymous said...

Ekdam right. lokancha attention span (for visual and reading) kami zala aahe.