Thursday, October 18, 2007

स्वप्न महासत्तेचे!


भारताने महासत्ता व्हावे, असे देशातील एका विशिष्ट वर्गाला- शहरी, आंग्लभाषक, उच्चमध्यमवर्गीय किंवा नवश्रीमंत वर्गाला- वाटत आहे. आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण, तंत्रज्ञान क्रांती या सर्वांमुळे हा वर्ग सुस्थित झाला आहे. त्याच्या हातात पैसा खेळू लागला आहे. त्याची मुले-बाळे अमेरिकादी प्रगत देशांत स्थायिक होत आहेत- किंवा नव्या प्रवाहानुसार तेथून परत येत आहेत. माहिती तंत्रज्ञान, सेवा उद्योग या सर्व क्षेत्रांत हाच वर्ग आहे. प्रसारमाध्यमामध्येही याच वर्गाचे वर्चस्व आहे.

त्यामुळे "भारत महासत्ता कसा बनू शकतो,' हा विषय माध्यमांमध्ये सतत चर्चेला असतो. भारतातील उच्चमध्यमवर्गीयांच्या आणि नवश्रीमंतांच्या बाजारपेठेकडे पाहून पाश्‍चिमात्य वित्तसंस्था, सल्लासंस्था भारताचे कौतुक करीत आहेत. "भारत ही उगवती महासत्ता आहे,' असा निष्कर्ष याच संस्थांनी काढला आणि आम्ही हुरळून गेलो. आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. याच आनंदात आम्ही छोटे-मोठे विजय जल्लोषात साजरे करीत आहोत. (त्यामुळे ट्‌वेंटी-ट्‌वेंटी क्रिकेटचा विश्‍वकरंडक जिंकल्यानंतर देशात "हिस्टेरिया' निर्माण झाला, यात काहीच आश्‍चर्य नाही.)

असो. भारताने महासत्ता बनण्यास हरकत नाही. पण, प्रश्‍न हा आहे, की महासत्ता म्हणजे नेमके काय? आम्हाला कशासाठी महासत्ता व्हायचे आहे? आज अमेरिका महासत्ता आहे- अफगाणिस्तान, इराक आदी देशांवर तिने आक्रमण केले आहे. आता कदाचित इराणमध्येही करेल. नव्वदच्या दशकाच्या आधी अमेरिका आणि सोव्हिएत संघ या दोन महासत्तांमध्ये शीतयुद्ध होते. सारे जग या शीतयुद्धाच्या छायेत होते. आम्हाला अशा प्रकारची लष्करी महासत्ता हवे आहे काय? जगावर आमची जरब बसवायची आहे काय? पण, अशी जरब असल्याने आपण मोठे ठरतो का? अफगाणिस्तान, इराकवर अमेरिकेने आक्रमण केले; परंतु तेथे ती फसत चालली आहे. स्थानिक जनतेचा रोष तिने ओढवून घेतला आहे. व्हिएतनाम युद्धातही हेच झाले होते. एवढी बलाढ्य अमेरिका; पण व्हिएतनाममधून तिला अखेरीस माघार घ्यावी लागली. त्यामुळे लष्करी महासत्ता झाल्याने जरब कदाचित निर्माण होईल; पण यश येईलच याची खात्री नाही.

असे म्हणतात, की भारत आर्थिक महासत्ता होणार आहे. आर्थिक विकासाचा दरही सध्या चांगला आहे. त्यामुळे आर्थिक आघाडीवर चांगली कामगिरी करता येऊ शकेल; पण यामुळे आमचे मूळ प्रश्‍न सुटतील का? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य.. या मूलभूत क्षेत्रांतील आमचे प्रश्‍न आजही तसेच आहेत. देशातील 80 टक्‍क्‍यांहून अधिक (म्हणजे तब्बल 80 कोटी) जनता दररोज 80 रुपयांहून (दोन डॉलरहून) कमी रकमेवर गुजराण करावे लागत असल्याचा अहवाल जागतिक बॅंकेने नुकताच जारी केला आहे. देशातील दोन तृतियांश जनता तर दररोज 40 रुपयांहून कमी रकमेवर गुजराण करीत आहे. जगातील एक तृतियांश गरीब लोक भारतात आहेत. म्हणजे प्रत्येक जगातील तीन गरीबांमधील एक गरीब भारतातील आहे. या जनतेला रोजगाराची संधी कमी आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे आणि त्यांना आरोग्याच्या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. म्हणूनच देशातील प्रत्येक शहरांतील चौकांमध्ये भीक मागणारी दीनवाणी मुले नजरेस पडत असतात.

आपण आर्थिक महासत्ता झाल्याने हे दृश्‍य बदलणार आहे काय? सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना दर्जेदार प्राथमिक शिक्षण मोफत मिळू शकेल काय? तालुका पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा निर्माण होतील काय? तेथे डॉक्‍टर, परिचारिका उपलब्ध होतील काय? शहरांमधील सार्वजनिक रुग्णालयांत औषधांचा तुटवडा कमी होईल काय? खागसी बड्या रुग्णालयांतील तपासणीच्या महागड्या सुविधा या रुग्णालयांतही येतील काय? महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील बालकांचे कुपोषण थांबेल काय? हिवताप-क्षयरोग-डेंगी-चिकुन गुणिया या रोगांचा सामना आम्ही यशस्वीपणे करू शकू काय? मोठ्या शहरांतील सार्वजनिक वाहतुकीची सुविधा सुधारेल काय? शिक्षणाचा परीघ विस्तारेल काय? दर्जेदार व्यावसायिक शिक्षणाची संधी सर्वांना मिळेल काय? रोजगाराच्या संधीही वाढतील काय? पिण्याचे शुद्ध पाणी सर्वांना मिळू शकेल काय? असे अनेक प्रश्‍न आहेत.

हे प्रश्‍न आहेत- भारतातील अतिसामान्य माणसांचे. ज्यांच्या मतांवर कॉंग्रेससारखे पक्ष वर्षानुवर्षे निवडून येत आहेत. हा पक्ष सत्ता उपभोगतोय. अन्य पक्षांनीही सत्तेची चव चाखलीय. सत्तेत आणि सत्तेच्या वर्तुळात असलेल्या सर्वांचे भले झाले. पुढील कितीतरी पिढ्या बसून खाऊ शकतील, एवढी संपत्ती या सर्वांनी मिळविली. बाकी उद्योगपती, नोकरशहा, व्यापारी.. या सुस्थित वर्गातील लोकांचेही बरेच असते. पण, या सर्वांचे भले होणे म्हणजे देशातील 110 कोटी जनतेचे भले होणे नव्हे. शरीराचा एखादा भाग ज्यावेळी सुदृढ दिसायला लागतो- तेव्हा त्याला सूज म्हणतात. आणि ही सूज पुढे साऱ्या शरीराला त्रासदायक ठरते.

त्यामुळे देशातील सामान्यांचे प्रश्‍न सुटणे महत्त्वाचे आहे. त्ता होण्याच्या प्रक्रियेने हे प्रश्‍न सुटणार असतील, तर महासत्ता होण्यास हरकत नाही; पण तशी चिन्हे तरी दिसत नाहीत. देशात एकीकडे गोदामे अन्नधान्यांनी खच्चून भरली आहेत आणि दुसरीकडे उपासमारीने, कुपोषणाने लोक मरत आहेत. म्हणजे महासत्ता होणे, हे विषमता घालविण्यावरील उत्तर नाही, असे दिसते. तसे जर असेल, तर मग का हवी आहे महासत्ता?

3 comments:

Anonymous said...

"Middle class"la ego sukhvayche ahe. Mhanunch tyanna watate ki India Superpower whavi.

Unknown said...

when this 800 million strong poor peoples vote bank will realise that food & shelter is their right & politicians are not doing them any favour by giving them water ,electricity & roads that day INDIA will start developing in real sense.
We have free this 800 million population from local level politicians first & get them to fight for their rights at grass root level.

shraradashtekar said...

kruti kara fakt lihu nakaa 800 million he wachnar nahi je wachtil te kahi karnar nahisagle gaandu mi pan kadachit......