Tuesday, May 27, 2008

"आयकॉन'ची मांदियाळी


भारत बदलतोय। माहिती तंत्रज्ञान क्रांती, जागतिकीकरण, खासगीकरण, सेवा उद्योगांचे वाढते वर्चस्व यांमुळे भारतातील मध्यमवर्ग बदलतो तर आहेच; पण त्याचा विस्तारही होत आहे. मल्टिप्लेक्‍स, मॉल्स, मोबाईल फोनधारकांची 25 कोटींच्या वर गेलेली संख्या, मोटारींचे नवनवे ब्रॅंड्‌स, दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये दिवसागणिक पडणारी भर, यांमुळे केवळ चार- सहा महानगरांचाच नव्हे, तर मध्यम आणि छोट्या शहरांचाही चेहरा- मोहरा बदलत आहे. भौतिक साधनांची रेलचेल वाढते आहे. नवनव्या संधींमुळे म्हणा किंवा सुबत्तेमुळे म्हणा मध्यमवर्गीयांच्या संकल्पनाही बदलत आहेत. गरजेपेक्षा अधिक पैसे मिळविणे म्हणजे जणू काही पाप करणे, असे या वर्गाला एकेकाळी वाटत असे. मात्र, त्याचा हा समज आता दूर होत आहे. त्यामुळे करिअरच्या नवनव्या क्षेत्रांत तो आता सहजगत्या वावरत आहे. या साऱ्यांमुळे त्याची जीवनविषयक मूल्ये आणि श्रद्धास्थानेही (आयकॉन्सही) बदलत आहेत.

वास्तविक भारतासारख्या देशात जनसमुदायाच्या श्रद्धास्थान असलेल्या व्यक्तींची संख्या काही कमी नाही। धर्म, समाजसुधारणा, स्वातंत्र्यचळवळ, शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य, चित्रपट आदी विविध क्षेत्रांतील उत्तुंग व्यक्तिमत्त्वे आपल्याकडून होऊन गेली. काहींना तर लोकांनी चक्क देवपण बहाल केले, तर काही जण जिवंतपणीच दंतकथा बनून राहिले. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वाभाविकच स्वातंत्र्य आंदोलनातील नेत्यांचा मोठा पगडा समाजावर होता. महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनायक दामोदर सावरकर आदींसारख्या मातब्बर नेत्यांनी त्या काळात लोकमानसावर राज्य केले. एक आदर्श म्हणून, प्रेरणास्रोत म्हणून लोक त्यांच्याकडे बघत. कोणी त्यांचा आदर्शवाद जपत, तर कोणी त्यांचा विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील आदर्शवाद नंतर हळूहळू लोप पावत गेला, तरी आदर्शवाद्यांची एक मोठी परंपरा आपल्याकडे आहे। "साधी राहणी- उच्च विचारसरणी,' हा शब्दप्रयोग या आदर्शवादानेच रूढ केला आहे. भौतिक सुखाकडे पाठ फिरवत विचारांची बांधिलकी मानून समाजकार्य करणाऱ्यांचीही परंपरा आपल्याकडे आहे. साठ आणि सत्तरच्या दशकांत मध्यमवर्गीयांना आकर्षण होते, ते अशा आदर्शांचे. साने गुरुजी आणि त्यांची धडपडणारी मुले हे या आदर्शवादाचे एक प्रतीक म्हणता येईल. 1971 च्या बांगलादेश युद्धानंतर, सामान्य माणूस तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना "दुर्गामाते'च्या रूपात पाहत होता; परंतु परिस्थितीनेच असे काही वळण घेतले, की आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधी चक्क "व्हिलन' ठरल्या आणि जयप्रकाश नारायण "हीरो'. पुढे जनता पक्षाच्या सरकारने भ्रमनिरास केल्याने मध्यमवर्गीय राजकारणापासून दूर होत गेला.

केवळ राजकारण किंवा आदर्शवादाचेच आकर्षण समाजाला नव्हते। साहित्य, कला, चित्रपट आणि क्रिकेट या क्षेत्रांतील दिग्गजही त्यांना खुणावू लागले होते. साऱ्या देशवासीयांच्या गळ्यातील ताईत बनण्याचे भाग्य मात्र चित्रपट आणि क्रिकेटमधील "ताऱ्यां'नाच लाभले. साठच्या दशकात भारतीय चित्रपटही वयात येऊ लागले. चित्रपटांतील कलावंत आणि गायक मंडळी रसिकांच्या हृदयावर राज्य करू लागली. म्हणूनच तर दिलीपकुमार, राजकपूर आणि देव आनंद या त्रयींना "स्टार'पण लाभले आणि लता मंगेशकर गानकोकिळा बनल्या. पुढे भावुक आणि स्वप्नाळू चेहऱ्याचा राजेश खन्ना चक्क "सुपरस्टार' बनला. सत्तरचे दशक संघर्षाचे होते. लोक रस्त्यावर उतरत होते. व्यवस्थेबद्दलची चीड लोकांमध्ये निर्माण झाली. या व्यवस्थेविरुद्ध रुपेरी पडद्यावर पेटून उटणाऱ्या अमिताभ बच्चनमध्ये लोक स्वतःला पाहू लागले आणि पाहता- पाहता हा "अँग्री यंग मॅन' "सुपरस्टार' झाला.

नव्वदचे दशक भारताला कलाटणी देणारे ठरले। वास्तविक त्याची नांदी ऐंशीच्या उत्तरार्धातच झाली होती। इंदिरा गांधींच्या दुर्दैवी हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले. भारताला एकविसाव्या शतकाचे स्वप्न पाहण्यास त्यांनी शिकविले. आधुनिकीकरणाची, संगणकीकरणाची त्यांनी केवळ भाषाच वापरली नाही, तर कृतीही केली. याच काळात सोव्हिएत साम्राज्य कोसळले, बर्लिनची भिंत पडली आणि पूर्व युरोपातील साम्यवादही संपुष्टात आला. जग एकध्रुवीय बनत गेले आणि जागतिकीकरणाची लाट आली. माहिती तंत्रज्ञानाने ही लाट शक्तिशाली केली आणि मध्यमवर्गीयांसाठी संधीची अनेक दालने खुली झाली. नव्वदच्या दशकाने केवळ माहिती तंत्रज्ञानच नव्हे, तर दूरसंचार, प्रसार माध्यमे, करमणूक, सेवा उद्योग, जैवतंत्रज्ञान आदी अनेक क्षेत्रांत क्रांती घडवून आणली.

साठच्या दशकातील आदर्शवाद, सत्तरच्या दशकातील संघर्ष मागे पडला। चित्रपट आणि क्रिकेटमधील तारकांबरोबरच नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करणारे, जागतिक प्रस्थापितांना धक्का देणारे, नवा आशय मांडणारे देखील सर्वसामान्यांना खुणावू लागले. अमिताभची जागा शाहरूख खानने घेतली आणि गावसकरची जागा सचिन तेंडुलकरने; पण यांच्या जोडीनेच नारायणमूर्ती, अझिम प्रेमजी हेही "आयकॉन'च्या रांगेत जाऊन बसले. रतन टाटांबद्दलचा आदरही वाढत गेला. प्रथम माधुरी दीक्षित आणि नंतर ऐश्‍वर्या राय या अभिनेत्रीही "आयकॉन'पदापर्यंत पोचल्या.

राजकारण्यांची विश्‍वासार्हता कमी होण्याच्या या काळात अन्य क्षेत्रातील व्यक्तींचे कर्तृत्व अधिक उंच वाटू लागले। विशेषतः "मिसाईल मॅन' डॉ. अब्दुल कलाम यांच्या सारख्या शास्त्रज्ञांचे. लहान मुलांशी सहजपणे संवाद साधण्याची त्यांची हातोटी इतकी विलक्षण, की त्यामुळे ते "कलाम चाचा' कधी बनले हे समजलेच नाही. त्यामुळे "आयकॉन' बनलेले कलाम नंतर राष्ट्रपती बनले. छोट्या पडद्यावरील कलावंतांची लोकप्रियताही याच काळात वाढत गेली. त्यामुळे प्रणव रॉय, स्मृती इराणी, शेखर सुमन ही मंडळीही "स्टार'पदाला जाऊन पोचली. राजकारण्यांची लोकप्रियता आटत असली, तरी अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी आणि लालूप्रसाद यादव यांची एक वेगळी प्रतिमा देशभर झाली.

एकविसावे शतक सुरू झाले आणि मध्यम व छोट्या शहरवासीयांच्या आशा-आकांक्षांना धुमारे फुटले। माहिती आणि दूरसंचार क्रांतीमुळे साऱ्या जगातील घटना-घडामोडी आणि "ट्रेंड्‌स' छोट्या-छोट्या वेळेत ठिकाणाही पोचू लागल्या. त्यामुळे "एक्‍स्पोजर' वाढत गेले. त्याचा परिणाम म्हणजे छोट्या ठिकाणांहून किंवा प्रतिकूल परिस्थितीतून आलेले युवक- युवती चमकदार कामगिरी करू लागले. महेंद्रसिंह धोनी हे त्याचे ठळक उदाहरण. रांचीसारख्या ठिकाणच्या धोनीने भारतीय क्रिकेटमध्ये एक नवी आक्रमकता आणली आहे. त्यामुळेच सध्याच्या "आयपीएल'मध्ये सर्वाधिक बोली त्याच्यावर लागली; पण धोनी हे काही एकमेव उदाहरण नाही. प्रवीणकुमार, इशांत शर्मा यांसारखी अनेक नावे घेता येतील. क्रिकेटमध्येच नव्हे, तर चित्रपट, दूरचित्रवाणी, उद्योग आदी अन्य क्षेत्रांतही हेच घडत आहे. दूरचित्रवाणीवरील "टॅलेंट हंट' कार्यक्रम याची प्रचिती देतात. म्हणूनच नवनवीन "आयकॉन्स' निर्माण होत आहेत.

"साधी राहणी, उच्च विचारसरणी' या आदर्शवादाचा उल्लेख आज होत नसला, तरी आदर्शांबद्दलचे समाजाचे आकर्षण कायम आहे। फक्त "आदर्श कोण,' हा प्रश्‍न सापेक्ष बनला आहे. म्हणूनच "आयकॉन'ची मांदियाळी आज दिसते आहे. बदलत्या भारताचे, बदलत्या जीवनशैलीचे हेही एक निदर्शक आहे.

श्रीधर लोणी

No comments: